वाचक लिहितात   

हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र?
 
वैष्णवी हगवणे या २३ वर्षीय विवाहितेचा हुंड्याच्या छळामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि पुन्हा एकदा हुंडाबळी हा विषय ऐरणीवर आला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणार्‍या संबंधित लोकांना १९६१ च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा होईलच, पण खरे तर क्रौर्याची परिसीमा गाठून मानवतेला काळिमा फासणार्‍या अशा प्रकारच्या हुंडाबळीच्या घटना या महाराष्ट्राला नवीन नाहीत. यांसारख्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यात अनेक महिलांचे बळी गेले आहेत. २१ व्या शतकातील पाव शतक उलटले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, कृत्रिम प्रज्ञेच्या जमान्यात जग एका क्लिकवर आले तरीही काही लोकांची क्रूर, हिंसक आणि विकृत मानसिकता अजूनही अस्तित्वात असल्याचा प्रत्यय असल्या लांच्छनास्पद व दुर्दैवी घटनांमुळे येत राहतो. अशा परिस्थितीत समाज मनात खोलवर रुतलेली हुंड्यासारखी ही गंभीर सामाजिक समस्या पूर्णपणे केव्हा नष्ट होईल? हाच खरा प्रश्न आहे. ’पुरोगामी महाराष्ट्र’ अशी उपाधी मिरवणार्‍या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा मुखवटा वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गळून पडला आहे.
 
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
अवकाळीचा अतिरेक
 
’नेमेचि येतो पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!’ ही कवी कल्पना खरेच आता कालबाह्य ठरू पाहात आहे! तो कधी येईल, कसा येईल याचा आता नेम राहिलेला नाही! तो कधी घशाला कोरड पाडतो, तर कधी नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरण्याइतके बरसतो! याला सर्वस्वी मानवी वृत्तीच जबाबदार आहे. मान्सून पूर्व येणारा मर्यादित स्वरूपाचा अवकाळी पाऊस बळीराजाला जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त ठरत असला तरी, त्याच्या अतिरेकाने हाताशी आलेल्या काही नगदी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. जीवित व वित्तहानीचे भयंकर प्रसंग ओढवत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचे संवर्धन दूरच, पर्यावरणाचे रक्षणसुद्धा मानवाच्या हातून घडत नाही आणि म्हणूनच नेहमीची उडणारी दाणादाण हा त्याचाच परिपाक आहे!
 
श्रीकांत मा.जाधव, अतीत (जि.सातारा)
 
जनजीवन विस्कळीत
 
सद्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांतील व्यवस्था कोलमडली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे बंधारे ओसंडून वाहत आहेत, तर काही प्रमुख रस्त्यांवर पाणी आले आहे. सातत्याने वातावरणामध्ये बदल होत असून अनेक मानवनिर्मित घटनांमुळे निसर्गसुद्धा आपली ऋतुचक्र बदलले आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात वळीव पाऊस होतात; मात्र असला कधी मे महिन्यात एकसारखा पाऊस पडल्याचे दिसून आलेले नाही. पावसाळ्यापूर्वी सरकारने पूरबाधित क्षेत्राची पाहणी करुन योग्य नियोजन केले पाहिजे. शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रकारची घाईगडबड न करता हंगामी पाऊस सुरु झाल्याशिवाय पेरणी न केलेली बरी. कारण कधीही ते हिताचे ठरणार आहे! 
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
मूल्यांकन प्रक्रियेला ठेंगा..!
 
नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांतील संसाधने आणि शिक्षणाचा दर्जा यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा मूल्यांकन प्रक्रियेला चालना दिली आहे. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे, त्यासाठी आवश्यक संसाधनाद्वारे त्यांना धोरणे आखण्यात सक्षम बनवणे, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे, यासाठी शासनाने शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली; मात्र राज्यातील १२५९ शाळांनी या प्रक्रियेला अद्याप हातही लावलेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. मुंबई उपनगरात १९० शाळांनी प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. या मूल्यांकन प्रक्रियेत लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा आणि भंडारा यांनी ९८ टक्के शाळांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांनी शाळा मूल्यांकन प्रक्रियेला ठेंगा दाखवल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता शाळा मूल्यांकन प्रक्रिया ही योग्यच बाब आहे.
 
भाऊसाहेब शिरसाठ, अशोकनगर
 
हुंडा - एक राक्षसी वास्तव
 
नुकतीच एका प्रतिष्ठित कुटुंबातील, उच्चशिक्षित मुलीला सासरच्या सातत्यपूर्ण हुंड्याच्या मागण्यांनी स्वतःचा जीव गमवावा लागल्याची घटना घडली. ही केवळ एक घटना नाही, तर विज्ञान युगातही आपल्या समाजात खोलवर रुतून बसलेल्या ‘हुंडा’ नावाच्या रोगाचे हे एक भयंकर लक्षण आहे आणि समाजातील अनेक माता-भगिनी याला बळी पडतात; परंतु त्यातील मोजक्याच आपल्या नजरेस पडत आहेत. ’बेटी बचाओ’चा नारा आपण देतो; पण जेव्हा तीच ‘बेटी’ लग्न होऊन सासरी जाते. तेव्हा तिच्या डोळ्यातले स्वप्न फोडण्याचे काम ‘हुंडा’ नावाचे दानव करते. एक मुलगी गेली, तिचे आयुष्य संपले; पण प्रश्न संपला नाही आणि हेच आपल्याला पुन्हा-पुन्हा विचार करायला लावते की, आपण खरेच प्रगत झालो आहोत का?
 
आकाश हरिभाऊ भोरडे, जि. पुणे.

Related Articles